नागालँडच्या अंतरंगात - हे निव्वळ प्रवासवर्णन नाही, किंवा प्रवासाच्या आठवणीही नाहीत. काही काळ एका प्रदेशात वास्तव्य केल्यानंतर, आजही निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जमातींसाठी निसर्गाची जपणूक, आदिवासींचं पारंपरिक ज्ञान किती महत्वाचं आहे, हे समजूनउमजून लिहिलेलं हे पुस्तक आहे. आपल्या देशाची ईशान्येची बाजू कायमच दुर्लक्षित राहिलेली दिसते. प्रादेशिक, भौगोलिक दुर्गमता, भाषेची समस्या, वाहतुकीची असुविधा, लहरी हवामान आणि येथील देशवासीयांविषयीच्या आपल्या मनातल्या अनेकानेक गैरसमजुती. ही काही ठळक कारणे चटकन समोर येतात. पण अशा प्रदेशात काही वर्षे सलग संशोधनासाठी वास्तव्य करताना, एका अभ्यासू, बुद्धिमती, संवेदनशील, जिज्ञासू लेखिकेच्या नजरेने टिपलेला ईशान्येकडील टोकाचा प्रदेश ‘नागालँडच्या अंतरंगात’ या पुस्तकातून वाचकांना भेटतो आणि आपल्या गैरसमजुतींचे कपचे उडवत येथील सर्वसामान्यांचे अस्सल जगणे समोर ठेवतो. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे ‘हे नुसते प्रवासवर्णन नाही, केवळ आठवणीही नाहीत तर एका वेगळ्या प्रदेशाच्या अभ्यासातून आम्ही सगळे काय शिकलो, आदिवासींचं पारंपरिक ज्ञान आजही किती उपयोगाचं आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात आजही जगणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जमातींसाठी निसर्गाची जपणूक किती महत्त्वाची आहे, हे या कामाने आम्हाला शिकवलं,’ त्याची ही गोष्ट आहे. इथले अनुभव पर्यटकांसारखे अलिप्त, तटस्थ नाहीत कारण इथे काम, संशोधन, अभ्यास करताना लेखिका इथल्या प्रश्नांत, जंगलांत आणि माणसांतही नकळत गुंतून गेल्याचे जाणवते. वनस्पतीशास्त्रात उच्च शिक्षण आणि ‘मानव वनस्पतीशास्त्र’ (एथनोबॉटनी) या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या लेखिका अर्चना जगदीश केंद्र सरकारच्या वनस्पती सर्वेक्षण विभागात नोकरी करत होत्या. मात्र त्यांच्यासारख्या स्वतंंत्र विचारांच्या, प्रत्यक्ष संबंधित स्थळी जाऊन संशोधनात रस असलेल्या संशोधक वृत्तीच्या व्यक्तीला संस्थेतील सरकारी कारभाराचा वैताग येऊन त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि स्वत:ची संस्था स्थापन करून स्वतंत्रपणे आवडीच्या विषयात संशोधनाला सुरुवात केली. लेखिकेची ही पार्श्वभूमी या पुस्तकाचे वाचन करताना लक्षात घेणे आवश्यक आहे. १९९५ साली ‘नागालँड एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (नेपेड) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली आणि संशोधनातील डॉ. अर्चना यांचे वेगळेपण जाणवून या प्रकल्पांतर्गत पाच वर्षे नागालँडमधील आदिवासींमध्ये ‘लोकसहभागातून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण’ या उद्दिष्टासाठी लेखिकेची निवड झाली. स्वत: नागालँडला पोचण्यापूर्वी चार नागा अधिकाऱ्यांना ‘नेपेड’ प्रकल्पाच्या पूर्वतयारीसाठीचे प्रशिक्षण लेखिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी पुण्याजवळ दिले. ते प्रकरण आवर्जून वाचावे, असे जमून आले आहे. पुस्तकाची मांडणी लेखिकेने १६ प्रकरणांत केली आहे. नागा लोकांची पारंपरिक झूम पद्धतीची शेती, प्रत्येकाच्या आवडीची झू (राइस बिअर), तीता चहा, तिथले आंग (राजे), कॉकिलाहा (तुणतुण्यासारखे वाद्य), नागा लोकांमधील सामाजिक उतरंड – जातिजमाती, बोली, हे सारे लेखिकेने विलक्षण आत्मीयतेने अनुभवले आहे आणि त्याच जिव्हाळ्याने ते शब्दबद्धही केले आहे.
नागांच्या राजधानीकडे नेणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३९ हा वाचकाच्याही प्रवासाचा मार्ग बनून जातो, इतके चित्रमय वर्णन लेखिका करते. तेथील पतकई डोंगररांगांतून आपणही वळणावळणांचे अवघड रस्ते पार करतो. धुक्याचे दाट पडदे अनुभवतो. त्या वाटांवरून किरमिजी लाल किनारीच्या, काळ्या शाली घेतलेल्या आणि बांबूच्या टोपल्या डोक्यावर अडकवून शेतावरून परतणाऱ्या अंगामी लोकांच्या रांगाही आपल्याला दिसू लागतात. अतिपूर्वेचा प्रदेश असल्याने पहाटे चारपासून इथे उजाडते आणि मंडळी कामाला लागतात. दुपारी चारनंतर सर्व सामसूम होते – हा दिनक्रम अंगवळणी पडणे लेखिकेला किती कठीण गेले, याची माहितीही वाचनीय आहे. कोहिमामधील लेखिकेचे वास्तव्य आणि तेथील आदिवासी बाजार – हरणाच्या मांसापासून रानभाज्यांपर्यंतचे असंख्य खाद्यप्रकार – बोकड, हरीण, बेडूक, कासवं, खारी, पक्षी, कोंबड्या, पोर्क, कुत्र्याचं मांस (हे इथं डेलिकसी समजलं जातं), गोड्या पाण्यातले मासे, खेकड्यांच्या माळा, मधमाश्या, झिंगे, अशी खाद्ययादी पाहून, वाचूनच घाम फुटावा, अशी परिस्थिती लेखिकेने तिथे अनुभवली आहे. शिवाय रानभाज्या, कंदमुळं, फळं यांचे असंख्य प्रकार नागालँडमधील जैवविविधतेचा परिचय लेखिकेला सुरुवातीलाच करून देतात. वर्षातून आठ महिने कोसळणारा पाऊस इथे झपाट्याने जंगलांची वाढ करतो. ईशान्येकडील या प्रदेशात स्वातंत्र्यानंतर वनस्पती सर्वेक्षणाचे काम सुरू झाले होते. तेव्हा देशातील एकूण वनस्पतींपैकी ४० टक्के वनस्पती इथे एकवटल्याचा निष्कर्ष निघाला होता. बांबूच्या ११० जातींपैकी ६० जाती इथे सापडतात. मात्र येथील लोकांच्या सर्वभक्ष्यीपणामुळे प्राणी, पक्षी झपाट्याने कमी होत चालल्याचे निरीक्षणही लेखिका नोंदवते. नागा लोक मिथुन पाळतात. मिथुन म्हणजे जंगली गवा, रेडा यांची एक जात, जी माणसाळवलेली असते. हे मिथुन मेजवानीतील मुख्य पदार्थ असतात. मिथुनांच्या संख्येवर येथील व्यक्तीची प्रतिष्ठा, वजन अवलंबून असते. अलीकडे तर मुलांच्या शिक्षणासाठी एक – दोन मिथुन विकून पैसा उभा करण्याचा प्रघात आहे, यावरून मिथुनांचे महत्त्व लक्षात येते. नागालँडमध्ये लेखिकेने सुमारे पाच वर्षे वास्तव्य केले. नेपेड प्रकल्प, कोन्याक नागांवरील स्वतंत्र संशोधन केले. त्यातून लेखिकेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली, याचा कृतज्ञ उल्लेखही पुस्तकात येतो. त्यातूनच पुढे लेखिकेने अरुणाचल प्रदेशातही काम केले. मात्र इतक्या दूरच्या प्रांतात ठरावीक काळात फक्त संशोधन करणे शक्य आहे. लोकसहभागातून प्रत्यक्ष जैवविविधता संरक्षणाचे काम उभे राहू शकत नाही, हे वास्तवही लेखिकेने वेळीच ओळखले आणि तेथील काम स्थानिक सहकाऱ्यांवर सोपवण्याचा निर्णयही घेतला. मुख्य म्हणजे या वास्तव्याचा, संशोधनाचा अहवाल लेखिकेने कोन्याक भाषेत अनुवादित करून स्थानिक गावांमध्ये उपलब्ध करून दिला. हा पाच वर्षांचा अनुभव लेखिकेला खूप काही देऊन गेला. ‘पारंपरिक ज्ञान, संस्कृती, विकासाचा रेटा या सगळ्यांत लोकांच्या सहकार्याने निसर्गसंवर्धनाचे आणि संरक्षणाचे काम करणे किती अवघड आहे, याची जाणीव मला या कामाने करून दिली. ही वाट किती अवघड आहे, हे समजले आणि तरीही याच वाटेने चालत राहायचे हा निर्णय घेण्याची ताकदही पूर्वांचलातील या कामाने दिली,’ असे लेखिकेने म्हटले आहे. नागालँडचा खरा विकास नागा आदिवासींच्या परंपरा, त्यांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते समजून घेतच करावा लागेल. इथल्या आदिवासींना मागास ठरवण्यापेक्षा शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या परंपरांमधून काय शिकता येईल, याचा विचार करायला हवा, अशी अपेक्षा लेखिका व्यक्त करते, तेव्हा वाचकही त्याच विचारांचा होऊन गेलेला असतो.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : अर्चना जगदीप ( Archana Jagdip) Binding : Paperback ISBN No : 9788187549857 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 261gms Width : 21.4 Height : 13.9 Length : 1.1 Edition : 1 Pages : 200
Rs. 200.00 Rs. 180.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging